
खामगांव – जालना रेल्वे मार्गाच्या फिल्ड सर्वेसाठी आलेल्या पथकाशी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची चर्चा*
मुंबई: सिद्धार्थ काळे.
खामगाव – जालना रेल्वेमार्ग होणे आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी किती गरजेचा आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्षात येण्यासाठी सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. खामगांव- जालना रेल्वे मार्गाच्या तांत्रिक सर्वेक्षणासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या सेंट्रल रेल्वेची ट्राफिक सर्वे टीम जिल्ह्यात आली आहे. पथक बुधवारी आणि गुरुवारी आपल्या जिल्ह्यात येत आहे. या पथकाचे प्रमुख उपआयुक्त (सर्वेक्षण) श्री. जैन यांच्यासोबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेबांनीं चर्चा केली.
चर्चेदरम्यान पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी या भागातील बाजारपेठेसोबतच औद्योगिक महत्व विषद करीत रेल्वे मार्गाचे महत्व पटवून दिले. ते म्हणाले, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव या चार तालुक्यांमधून हा रेल्वे मार्ग जात आहे. या भागातील कृषी व व्यापारी बाजारपेठेचे महत्व मोठी आहे. कृषी, व्यापार व औद्योगिक विकासासोबतच या भागातील रेल्वेमार्ग हा रोजगाराची गरज आहे. या भागापासून मुंबई- नागपूर सारखी औद्योगिक शहरे दूर असल्याकारणाने या भागातील उद्योजक, व्यापारी यांना दळणवळण व वाहतूक खर्च जास्त येतो. त्यामुळे निश्चितच या परीसराच्या कृषी, व्यापार व औद्योगिक विकासावर परिणाम होतो. हा मार्ग झाल्यास या परिसरातील वाहतुक खर्च कमी लागून परिणामी जिल्ह्यातील व्यापार वृद्धीसोबतच बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळणार आहे. वाहतुक सोपी झाल्यास औद्योगिक वसाहतींचा विकास होऊन उद्योगांना चालना मिळणार आहे, असेही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले.
चर्चेदरम्यान पालकमंत्री म्हणाले, या रेल्वे मार्गामुळे केवळ दळण वळणाची सुविधा होणार नसून जिल्ह्यातील पर्यटनीय स्थळांचाही विकास होणार आहे. जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मस्थान, लोणार येथील जागतिक किर्तीचे सरोवर तसेच शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी स्थळ येथील पर्यटनास चालना मिळणार आहे. हा मार्ग विदर्भ व मराठवाड्यातील पर्यटन, उद्योग, कृषी विकासासाठी महत्वाचा दुवा ठरणार आहे. या भागातील औद्योगिक मागासलेपण दूर सारण्यासाठी हा रेल्वे मार्ग होणे काळाची गरज आहे.
या रेल्वे मार्गामुळे जिल्ह्यातील अनेक वर्षातील प्रतिक्षेत असलेल्या विकास कामास नवी चालना मिळुन विकासाचे नवे पर्व सुरु होणार आहे. सेंट्रल रेल्वेची ट्राफिक सर्वे टीम फिल्ड सर्वे साठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या चर्चेनंतर हा रेल्वे मार्ग निश्चितच मंजुर होईल व जिल्ह्याच्या विकासाचे विकासपर्वाला गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
तत्पूर्वी पालकमंत्री यांनी सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव तालुक्यातील तहसीलदार यांच्याशी व जिल्हाधिकारी यांच्याशी यांना पथकातील सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याच्या सुचनाही दिल्या.