गोकुळ शिरगाव प्रतिनिधी
: महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी व अपघातामुळे होणारे मृत्यू हे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अभिनव संकल्पनेतून महामार्गावरील प्रत्येक गावात महामार्ग सुरक्षा समित्या स्थापन केल्या जात असून या समिती मार्फत गावातील तरुण कार्यकर्ते, महामार्गावरील दुकानदार, पानपट्टी चालक, गॅरेज व पंक्चर काढणारे कारागीर, अशा महामार्गावरील सुसंगत व्यवसायीक यांची नेमणूक या समित्यांमध्ये होणार असून या समितीमधील सदस्यांना प्रशासनाच्या वतीने आपात्कालीन परिस्थितीत वाहतूक नियंत्रण, महामार्गावरील वाहनचालकांचे रस्ता सुरक्षा विषयी प्रबोधन ,अपघात घडल्यास प्रथमोपचार व अपघात ग्रस्त हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तातडीची कार्य यासंबंधी सर्वंकष प्रशिक्षण देण्यात येणार असून यामुळे महामार्गावरील अपघात व अपघातामुळे होणारे मृत्यू कमी होण्यास मदत होणार आहे.यासाठी महामार्ग पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात असून महामार्गावरील गावांमध्ये महामार्ग पोलिस प्रशासनाच्या वतीने समित्या स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे सदर समित्या स्थापन करण्याच्या मोहिमेसाठी पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय पोलीस अधीक्षक संजय जाधव पुणे विभागाचे पोलिस उपाधीक्षक प्रीतम यावलकर पुणे विभागाचे पोलिस निरीक्षक राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उजळाईवाडी महामार्ग पोलीस उपकेंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरगुप्पे यांच्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे.
