Categories
लोहा

राज्यपाल मा.भगतसिंघ कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट!


लोहा,प्रतिनिधी(शिवराज पवार)
राजभवन,मुंबई येथे राज्यपाल मा.भगतसिंघ कोश्यारी व महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी २९ डिसेंबर २०२० रोजी भेट घेतली त्यात औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत झालेली मतपत्रिकांची हेराफेरी,संगणकपरिचालकांना आय टी महामंडळाकडून नियुक्ती देणे,बेरोजगार पदवीधरासाठी पदवीधर महामंडळ स्थापन करणे,विना अनुदानित शिक्षक,जुनी पेन्शन योजना,तासिका तत्वावरील प्राध्यापक,उमेद योजना,कंत्राटी कर्मचारी,शासकीय नौकर भरती करणे यासह अनेक विषयांचे निवेदन देऊन व्यापक व सविस्तर चर्चा केली,झालेल्या चर्चेनुसार राज्यपाल महोदय कारवाई करतील असे सिद्धेश्वर मुंडे म्हणाले.यावेळी शिष्टमंडळात मयूर कांबळे,विजयानंद येडेकर,संग्राम डिकळे व ज्ञानेश्वर सूर्यवंशी उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त की,नुकत्याच औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली,त्यात मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा आक्षेप सिद्धेश्वर मुंडेसह अन्य ५ उमेदवारांनी घेतला होता.त्याबाबतची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली असून या विषयासह इत्तर विषयाचे निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी राज्यपाल मा.भगतसिंघ कोश्यारी यांच्याकडे वेळ मागितला होता त्यानुसार २९ डिसेंबर २०२० रोजी त्यांनी दिलेल्या वेळेनुसार महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी शिष्टमंडळासोबत राज्यपाल महोदयांची भेट घेतली.त्यात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात कशा प्रकारे मतपत्रिकांची हेराफेरी केली त्याची लेखी कागदपत्रांच्या पुराव्यानिशी निवेदन देऊन माहिती दिली व मा.राज्य निवडणूक आयोगाला सत्यता पडताळण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्याचबरोबर संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील १० वर्षापासून काम करणार्‍या संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने देऊन सुद्धा किमान वेतन व कर्मचारी दर्जा दिला नाही,त्याबाबत राज्य शासनाला आदेश द्यावेत तसेच आपले सरकार प्रकल्पात csc –spv या कंपनीने कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला असून त्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रश्नाबरोबर राज्यातील सुमारे ४०००० विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमांनुसार १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१९ पासून अनुदान देणे,अघोषित शाळांना घोषित करणे महत्वाचे असून अनेक विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी आत्महत्या केल्याची बाब राज्यपाल महोद्यांच्या निदर्शनास आणली व याबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाला आदेश देण्याची मागणी केली.त्याचबरोबर राज्यात तासिका तत्वावरील सुमारे ३५००० प्राध्यापक असून त्यांना कोरोना काळापासून नियुक्ती देण्यात आलेली नाही तसेच इत्तर राज्यात ११ महिन्याच्या मानधन तत्वावर त्यांची नियुक्ती असून आपले राज्य सधन असताना असा अन्याय का यासह २००५ नंतर नियुक्ती देण्यात आलेल्या राज्यातील शिक्षक,प्राध्यापक,शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे,कंत्राटी व उमेद कर्मचारी यांची नियुक्ती csc –spv कंपनी सारख्या बाहय यंत्रणे कडून न करणे,राज्यात अनेक वर्षापासून शासकीय नौकर भरती केली नसून बेरोजगार पदवीधर/पदविका धारक यांना दिलासा देण्यासाठी नौकर भरती करणे यासह सर्व विषयांचे निवेदन दिले व राज्य शासनाला आदेश देण्याची मागणी केली.

पदवीधरांसाठी पदवीधर महामंडळ स्थापन करण्याची मागणी

राज्यात सुमारे २ कोटीच्या वर बेरोजगार पदवीधर असून बेरोजगार पदवीधर/पदविकाधारकां साठी एकीकडे शासकीय नौकर भरती नाही तर दुसरीकडे राज्य शासनाची कुठलीही योजना नाही,तसेच कुठला उद्योग–व्यवसाय नाही.पदवीधराना शासनाचा कोणत्याही प्रकारचा आधार नाही म्हणून राज्यातील अनेक युवक – युवतींनी वैतागून आत्महत्या केल्या आहेत.पदवीधर म्हणजे या राज्याचे व देशाचे उद्याचे भविष्य आहे आणि कुटुंबातील तरुण व्यक्ती निराशेपोटी जीवन संपवत असतील तर राज्य शासन गप्प का? त्यासाठी राज्य शासनाने पदवीधरांच्या विकासासाठी पदवीधर महामंडळाची स्थापना करावी व त्या अंतर्गत राज्यातील पदवीधरांच्या विकासासाठी व्यापक योजना आखून पदवीधराना सक्षम बाववावे,यासाठी राज्य शासनाला मा.राज्यपाल महोदयांनी निर्देश द्यावेत अशी मागणी प्रत्यक्ष निवेदन देऊन सिद्धेश्वर मुंडे यांनी केली आहे.यावेळी शिष्टमंडळात मयूर कांबळे,विजयानंद येडेकर,संग्राम डिकळे व ज्ञानेश्वर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started