- कृषि हवामान सल्ला सेवा विभाग प्रमुख डॉ. के.के. सिंग
राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख ) दि. 29 डिसें 2020कृषि उत्पादनात सुधारणा, प्रमाण आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी पीक हवामान प्रतिमाने ही उपयुक्त प्रणाली आहे. पीक हवामान प्रतिमाने व कृषि हवामान सेवा सल्ला यांचे महत्व वेगवेगळ्या पिकांच्या हवामान परिस्थितीची मुलभुत व अचूक हवामानाची पुर्व माहिती वेळेवर मिळाली तर ती उपयुक्त ठरु शकते. कृषि सल्ला सेवेद्वारे मिळालेल्या माहितीमुळे हवामान बदलाचा कृषि पध्दतीवर होणारा परिणाम वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय हवामान विभागाच्या कृषि हवामान सल्ला सेवा विभागाचे प्रमुख डॉ. के.के. सिंग यांनी केले. जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत असून या प्रकल्पांतर्गत पीक हवामान प्रतिमाने, हवामान अद्ययावत शेतीची साधने या विषयावर दि. 21 ते 25 डिसेंबर, 2020 या कालावधीत एक आठवड्याचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभासाठी डॉ. के.के. सिंग प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन व्हिएन्ना आंतरराष्ट्रीय केंद्र, ऑस्ट्रीया येथील बाह्य अंतराळ प्रकरण संयुक्त राष्ट्र संघ कार्यालय, यूएन स्पायडर प्रोग्राम, बिजींग कार्यालयाचे प्रमुख डॉ. शिरीष रावण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, सह समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, आयोजन सचिव डॉ. रवि आंधळे, सह सचिव व कृषि हवामानशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयवंत जाधव उपस्थित होते. यावेळी कुलगुरु डॉ. अशोक ढवण प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना म्हणाले की हवामान अद्ययावत शेतीसाठी पीक हवामान प्रतिमाने मोलाची भुमिका बजावत असून पीक उत्पादनवाढीसाठी त्याचा कार्यक्षम उपयोग कसा व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणे जास्त गरजेचे आहे. पीक हवामान प्रतिमाने या विषयावर संशोधन व विस्तार करण्यास महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी कटीबध्द आहे. प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी हवामान अद्ययावत शेतीचे प्रकल्पांतर्गत महत्व विषद केले. यावेळी प्रशिक्षणार्थींना डॉ. मुकुंद शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहल कानडे व डॉ. वैभव मालुंजकर यांनी केले. डॉ. जयवंत जाधव यांनी आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी देश विदेशातून 250 पेक्षा जास्त सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना कृषि हवामान शास्त्र या विषयातील देशभरातील तज्ञ शास्त्रज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.