नांदेडमधील ग्रामपंचायतीत आता भाजप vs भाजप
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.28.मधील मरळक गावात बापूराव शिंदे यांच्या निधनामुळे मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.
नांदेड तालुक्यातील मरळक ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. जागृत महादेवाचे मंदिर असल्याने मरळक गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. महादेव मंदिरामुळे सबंध जिल्ह्यात मरळक गावाची ओळख आहे. 40 वर्ष सत्ता राखणाऱ्या नेत्याच्या निधनानंतर या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे दोन गट आमनेसामने आल्याने चर्चा रंगली आहे.
मरळक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सध्या अनेकांचे उमेदवारी अर्ज भरणे सुरु आहे . या गावाची लोकसंख्या 6000 असून गावात 2500 मतदार आहेत.गावातील ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 11 आहे.मरळक ग्रामपंचायत पूर्वी भाजपच्या ताब्यात होती.
बापूराव शिंदेंच्या निधनानंतर राजकीय पोकळी
गावातील बापूराव शिंदे यांच्या गटाकडे ग्रामपंचायतीची सत्ता आहे.गेल्या चाळीस वर्षांपासून शिंदे यांचा शब्द हा गावासाठी प्रमाण होता. मात्र गेल्या वर्षी बापूराव शिंदे यांचं निधन झालं. त्यामुळे गावात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.
बापूराव शिंदेंच्या निधनामुळे मरळक गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. एक जुना भाजप गट आणि एक नवखा भाजप गट अशा दोन्ही गटांनी आपापली कंबर कसली आहे.गावात ताकदवान असलेल्या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचे कार्यकर्ते भाजपच्या जुन्या गटासोबत आहेत.
भाजपच्या नव्या गटासोबत शिवसेना-काँग्रेस
दुसरीकडे,शिवसेना आणि काँग्रेस भाजपच्या दुसऱ्या गटासोबत असल्याने भाजप विरुद्ध भाजप अशीच लढत या गावात राहणार आहे. त्यामुळे भाजपच्या नव्या-जुन्या पुढाऱ्यात या गावात सामना रंगणार आहे. त्यामुळे मरळक ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
सायाळ ग्रामपंचायत : भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ
नांदेड तालुक्यातील सायाळ ग्रामपंचायतीवर काँग्रेसची दीर्घकाळ सत्ता राहिली आहे. मात्र आता सायाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यात मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे नऊ सदस्य संख्या असलेल्या सायाळमध्ये सत्तेसाठी भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. अवघे अठराशे मतदार असलेल्या या गावाच्या निवडणुकीत मतदारांची आतापासून बडदास्त ठेवण्यात येत आहे.
दर्यापूरची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम
नांदेड तालुक्यातील दर्यापूर इथल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधपणे काढण्याचे जाहीर केलं आहे. दर्यापूर या गावाने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जोपासली आहे.गावात बहुसंख्य असणाऱ्या मराठा समाजाने वादविवाद टाळण्यासाठी ही प्रथा जोपासली आहे.या गावाची लोकसंख्या 740 असून गावकऱ्यांनी एकोपा आणि बंधुभाव कायमस्वरुपी जपला आहे.त्यातून जिल्ह्यात एक चांगले गाव म्हणून दर्यापूर गावाने आपली ओळख निर्माण केली आहे.