( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )
लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेत लोकशाही विरोधातच कुणीतरी म्हणतं, “विकृत लोकशाहीपेक्षा सुसंस्कृत हुकूमशाही बरी.” अशी विधाने करण्याचे स्वातंत्र्य लोकशाही खेरीज अन्य कोणत्याही राजवटीत नाही. या उलट लोकशाहीत मात्र कुणाच्याही बरोबर किंवा चुकीच्या मताचा आदर राखला जातो. त्यामुळे लोकशाहीशी प्रतारणा करणाऱ्या या विधानाशी आपण आपली केवळ असहमती दर्शवू शकतो. त्यानंतर आपल्या हाती उरते केवळ या विधानाची चिकित्सा करणे.
जगात राजकीय प्रणाली अनेक असल्या तरी प्रत्यक्ष लोकशाही, लोकशाही, हुकूमशाही, कम्युनिजम, राजेशाही या प्रमुख आहेत. जगातील कोणतीही राजकीय प्रणाली १०० टक्के परिपूर्ण नाही. लोकशाहीही नाही. तथापि उपलब्ध राजकीय प्रणालीत लोकशाही ही सर्वात अधिक प्रगत, प्रगल्भ, सर्वात कमी दोष असलेली मानली जाते. सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल हे तत्त्वज्ञही उपलब्ध राजकीय प्रणालीत लोकशाहीस सर्वोच्च स्थान देतात. देशाचे सर्वाधिक कल्याण, देशाचा सर्वांगीण परिपूर्ण विकास लोकशाहीच्या माध्यमातूनच साधता येतो, असे प्रतिपादन जगभरातील थोर अर्थतज्ज्ञही करतात. त्यासाठी ते जगातील अतिप्रगत लोकशाही असलेल्या देशांच्या अतिश्रीमंतीकडे व त्या देशांतील जनतेच्या सर्वोच्च मानव विकास निर्देशांकाकडे, बोट दाखवितात. भारतात आजही लोकशाहीच आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे असे जगभर मानले जाते आणि त्याबाबत मला अभिमान आहे. परंतु याच लोकशाहीस कुणी एखादा माणूस चक्क “विकृत लोकशाही” असे का दूषण देतो? हा माणूस जे म्हणतोय त्यात तथ्य किती? नेमकी कोणती विकृती या माणसास दिसली? अशी विकृती का निर्माण झाली? ही विकृती किती गंभीर स्वरूपाची आहे? उपाययोजना करून या विकृतीचे निर्मूलन करणे शक्य नाही का? या देशाचा एक नागरिक म्हणून ही लोकशाही निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून तिचे आपण पालन केले काय? कि स्वभावतःच लोकशाहीविषयी आपणास तिरस्कार असल्यामुळे ती लयास जावी म्हणून कळत-नकळत, अप्रत्यक्षपणे लोकशाहीच्या विरोधकांचे आपण सहायक बनलो आहोत? असे असंख्य प्रश्न मनात उभे राहतात.
परंतु ही लोकशाही बाजूला केल्यास आपण कोणती राजवट स्विकारणार? हुकूमशाही? म्हणजे रोगापेक्षा औषध भयंकर!
हुकूमशाहीत मालक फक्त एकच असतो आणि उरलेले सगळे गुलाम असतात! हुकूमशहाच्या दृष्टीने उर्वरित जनता किड्या मकोड्याच्या लायकीची असते. मग हुकूमशाहीचा स्विकार करून आपण गुलामी स्विकारायची? सुसंस्कृत हुकूमशाही? हा काय प्रकार आहे? सुसंस्कृत शब्दाची व्याख्या काय करण्यात आली आहे? कारण सुसंस्कृतपणा हा स्थल काल सापेक्ष असत़ो. ज्यास परदेशात सुसंस्कृतपणा मानला जातो त्यास भारतात असंस्कृतपणा मानला जाऊ शकतो. अमेरिकेत सार्वजनिक जागेत दांपत्याने एकमेकांचे चुंबन घेणे किंवा मुलींनी तोकडे कपडे घालणे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. या उलट भारतात हा असंस्कृतपणा मानला जातो. तसेच आज वाल्मिकी असलेल्या सुसंस्कृत हुकूमशहाचे उद्या दरोडेखोर वाल्यात रूपांतर होणार नाही कशावरून? १०० सद्गुणांनी भरलेल्या रावणाने अखेर सीतामाईच्या मोहात पडून तिचे अपहरण केलेच ना!
हुकूमशाही म्हटले की सर्वात प्रथम नावे समोर येतात ती ॲडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी या दोन आधी सुसंस्कृत पण नंतर सत्ता हाती येताच जगातील सर्वोच्च हिंस्र बनलेल्या क्रुरात्म्यांचे! न्यूनगंडाने पछाडलेल्या विकृत हिटलरने ६० लाख ज्युंचे अत्यंत पशूवत पद्धतीने खून पाडले. तर मुसोलिनीने ३० लाख जनतेची हत्या केली. जगावर दुसरे महायुद्ध हिटलरनेच लादले. या महायुद्धात त्याच्या जर्मनी देशातील, तसेच त्याची मित्र राष्ट्रे असलेल्या इटली, जपानसह विरोधी युरोपियन दोस्त राष्ट्रांमधील कोट्यवधी सैनिक मारले गेले. जगात सर्वत्र हाहाकार उडाला. कोट्यवधी संसार उजाड होऊन तितक्याच स्त्रिया विधवा झाल्या. कोट्यवधी स्त्रिया-मुले, वृद्ध मातापिता निराधार होऊन भूक शमवण्यासाठी रस्तोरस्ती भटकू लागली. जगातील सामाजिक स्थिती बिघडून सर्वत्र अराजक माजले. जगाची आर्थिक स्थिती घडी विस्कटून ते भिकेला लागले. हिटलरच्या छळछावणीत मारल्या गेलेल्या लक्षावधी ज्युंच्या हिंस्रभयकथा अनंत आहेत. त्याला ज्यू वंश व त्याचबरोबर त्याला वाटणारे इतर सर्व कमअस्सल मानव वंश जगातून नष्ट करायचे होते. जगात फक्त आर्य वंश शिल्लक राहील. बाकीचे उरलेच तर ते आर्यांचे गुलाम म्हणून जगतील, असे तो म्हणत असे. आजचा भारत म्हणजेच तेव्हाचा हिंदुस्थानही त्याच्या हिटलिस्टवर होता. भारतातील आर्यांच्या रक्तात भेसळ झालेली असून ते खरे आर्य राहिलेले नाहीत असा दावा तो करीत असे. हुकूमशहांची करणी अशी भयंकर असते.
बरे जर्मनीचा हिटलर किंवा इटलीचा मुसोलिनी हे दोघेही लोकशाहीतील सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन लोकशाहीलाच संपवण्यासाठी सत्तेवर आलेले. इंग्रजीत म्हण आहे, First call him dog and then shoot. या तत्त्वानुसार त्यांनी ठरवून पद्धतशीरपणे आपल्या देशातील तत्कालीन प्रस्थापित लोकशाहीस बदनाम केले. लोकशाही विकृत असल्याचे भयचित्र त्यांनी सातत्यपूर्वक प्रचार करून जनतेच्या मनावर ठसविले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रभक्तीचा मुद्दा जनतेच्या अंत: पटलावर बिंबविला. जे नागरिक आपल्या बाजूने बोलतील त्यांना राष्ट्रभक्त ठरवून त्यांना सन्मानित करायचे व जे विरोधात बोलतील त्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्या विरुद्ध प्रचार करून त्यांना जीवनातून उठवायचे हे तंत्र शास्त्रशुद्धरित्या अवलंबिले. तत्कालीन लेखक व समाज शास्त्रज्ञ उंबर्टो इको यांनी याबाबत हुकूमशाही प्रतिष्ठापना प्रक्रियेची काही लक्षणे मांडली आहेत. याबाबतचे त्यांचे निरीक्षण दांडगे आहे. त्यांनी हिटलर, मुसोलिनी यांच्या बरोबर इतरही अनेक हुकूमशाह्या, कम्युनिजम, राजेशाही प्रत्यक्ष अनुभवलेल्या असल्यामुळे त्यांच्या अर – फॅसिजम या प्रबंधास जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे.
उंबर्टो म्हणतात, हुकूमशाही प्रतिष्ठापना प्रक्रियेची १४ लक्षणे आहेत.
१) Cult of tradition – एखाद्या पारंपरिक पंथाचा उदय होतो. त्या माध्यमातून जुन्या परंपरांचा आपणास हवा तसा, आपल्याला सोयीस्कर असलेला अर्थ काढून तो जनतेच्या गळी उतरवला जातो.
२) Rejection of modernism. आधुनिक आचार विचार, कृती सर्वच ठोकरून देणे.
३) The cult for action for action’s sake. जशास तसे. कृतीला कृती करून उत्तर देणे. तर्कहीन विरोध.
४) Disagreement is treason. विरोधकांना देशद्रोही ठरविणे.
५) Fear of difference. विरोधकांच्या मनात वेगळे मत मांडण्याबाबत भीती, दहशत निर्माण करणे.
६) Appeal to social frustration. सामाजिक नैराश्य अधिक गडद करून मध्यमवर्गाला आपल्याकडे आकर्षित करणे.
७) Obsession with a plot. कटकारस्थानांचे आकर्षण असणे.
८) The enemy is both weak and strong. शत्रू्ला कमजोर तसेच बलवान, दोन्ही एकाच वेळी ठरवून तसा प्रचार करणे.
९) Pacifism is trafficking weak. (Life is permanent warfare.) जीवनासाठी संघर्ष नसून संघर्ष हेच जीवन आहे, हे जनतेच्या मनावर ठसविणे.
१०) Contempt for weak. सर्व क्षेत्रात अभिजन वर्गाची मक्तेदारी निर्माण करून कनिष्ठ वर्गाला वंचित ठेवणे.
११) Everybody is educated to become hero. येथे प्रत्येक माणसाला नायक बनवले जाते. आपण आहोत म्हणून राष्ट्र आहे. आपल्या शिवाय राष्ट्र् जगू शकत नाही. म्हणून जगायचे तर राष्ट्रासाठी, मरायचे तर राष्ट्रासाठी ही भावना प्रत्येकाच्या मनात भरविली जाते. अशाच भावनेने भारलेले पाकिस्तानी दहशतवादी मानवी बॉम्ब बनून भारतात घातपात घडवित असतात.
१२) Machismo and weaponry. स्त्रियांना गौण स्थान देणे. त्यांना कमी लेखणे. त्यांना आधुनिक विचारांपासून दूर ठेवणे. आधुनिक सुखसोयी शिक्षणापासून वंचित ठेवणे. त्यांच्या लैंगिक आवडीनिवडी वर बंधने घालणे. थोडक्यात तथाकथित पुरुषार्थ गाजविण्याचा उपदेश केला जातो.
१३) Selective populism. टिव्ही-इंटरनेट व इतर समाज माध्यमांतून विशिष्ट लोकांच्या गटांना बोलते करणे व ते जे बोलत आहेत तोच जनतेचा आवाज आहे असे भासविणे.
१४) Newspeak. प्रचलित शिक्षण पद्धती बंद करून स्वतःला पुरक असलेली शिक्षणपद्धती राबविणे. अभ्यासक्रमात बदल करून स्वतःचे गौरविकरण करणारे किंवा जुना इतिहास बदलून स्वतःला सोयीस्कर असलेला नवा इतिहास लिहून घेऊन स्वतः ची श्रेष्ठ प्रतिमा निर्माण केली जाते.
अशी ही हुकूमशाही लोकशाहीची शत्रू असून त्याखेरीज राजेशाही, धर्मशाही, कम्युनिजम, समाजवादी, प्रांतवादी, प्रादेशिक एकतंत्री पक्ष हे देखील शत्रू असतात. हे सर्व शत्रू मिळून लोकशाही बदनाम करण्याचे, तिला विकृत बनविण्याचे पराकोटीचे प्रयत्न करीत असतात. यांच्याकडूनच लोकशाही विरोधी अतिरंजित किंवा बनावट वृत्ते प्रसृत केली जातात. परंतु हे विरोधक जोपर्यंत मध्यमवर्गास स्वतःकडे आकर्षित करू शकत नाहीत तोपर्यंत लोकशाहीस कोणताही धोका नसतो. कारण मध्यमवर्ग हा कोणत्याही राजसत्तेचा प्रमुख आधारस्तंभ असतो. तो ज्याच्या बाजुने उभा असेल त्याची राजसत्ता स्थापन होईल. कनिष्ठ वर्ग हा बराचसा अज्ञानी, अंधश्रद्धाळू, अशिक्षित, अर्धशिक्षित असतो. विचार करण्याची त्याची कुवत किंवा त्याची स्मरणशक्ती जेमतेम असते. त्यामुळे मध्यमवर्गाचे केवळ अनुकरण करणे एवढेच शक्य असते, असे तत्त्वज्ञ सॉक्रेटिस सांगतो.
भारताच्या लोकशाहीत काही दोष जरुर आहेत. पण ते विकृती म्हणावेत इतके गंभीर नाहीत. असे दोष प्रत्येक व्यवस्थेत कमी अधिक प्रमाणात असतातच. बहुतांश भारतीय जनता अजूनही जातपात, धर्म, रुढी परंपरा, विभिन्न संस्कृती या बेडीत अडकलेली असल्यामुळे काही अनिष्ट गोष्टी घडत असतात. परंतु त्या विकृतीच्या पातळीवर पोहोचल्या आहेत असे म्हणणे अतिरेकी, तसेच अन्यायकारक आणि भारतीय जनतेच्या हितास मारक आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार संसद, प्रशासन यंत्रणा आणि न्यायपालिका हे भारतीय लोकशाहीचे तीन प्रमुख आधारस्तंभ असून ते आजही ठाम भक्कमपणे उभे आहेत हे अभिमानास्पद आहे.
भारताचा सर्वांगीण विकास, परिपूर्ण राष्ट्रकल्याण केवळ लोकशाहीच्या माध्यमातूनच होऊ शकते.