पेठ बीड पोलिसांची कामगिरी; ४८ तासात गुन्ह्याचा उलगडा
हिंदूसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
बीड:दि.26.बारदाना पोत्याच्या दुकानातील कामगाराने गल्ला उघडून आतील सव्वा तीन लाख रुपये लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि.२४) दुपारी बीड शहरातील जुना मोंढा भागात घडली होती.पेठ बीड पोलिसांनी ४८ तासात या चोरीचा छडा लावत अहमदनगर येथे जाऊन त्या फरार कामगाराला बेड्या ठोकल्या.यावेळी त्याच्याकडून २ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला.
बीडच्या जुना मोंढ्यातील बारदाना पोत्याचे व्यापारी मयूर जयनारायण काबरा यांच्या दुकानातील गल्ल्यात असलेले ३ लाख २५ हजार रुपये घेऊन दत्ता काशीद हा कामगार पसार झाला होता. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी दत्ता काशीद याच्यावर पेठ बीड ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या घटनेचा छडा लावण्याचे आदेश पेठ बीड पोलीस आणि ‘एलसीबी’ला देण्यात आले होते. दरम्यान, दत्ता काशीद अहमदनगर येथे असल्याची गुप्त माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पेठ बीड पोलिसांचे पथक अहमदनगरला गेले.सायबर सेलची मदत घेत पोलिसांनी दत्ताचा निश्चित ठावठिकाणा शोधला आणि सापळा रचून शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या.पेठ बीड ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली.पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ७४ हजार ५०० रुपये रोख आणि चोरीच्या रकमेतून खरेदी केलेला २० हजार ५०० रुपयांचा मोबाईल असा एकूण २ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक आर.राजा,अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एलसीबीचे पोलीस निरिक्षक भास्कर राऊत यांच्या मदतीने पोलीस निरिक्षक विश्वास पाटील,पीएसआय बनकर,पोलीस कर्मचारी राहुल गुरखुदे,गणेश जगताप,सुनील आलगट. आसेफ शेख,सचिन क्षीरसागर, महेंद्र ओव्हाळ,विकी सुरवसे यांनी पार पाडली.४८ तासात मुद्देमालासह आरोपीस अटक केल्याने पेठ बीड पोलिसांचे कौतुक होत आहे.